‘त्या’ ठिकाणी पुन्हा पकडले कत्तलीसाठी जाणारे 38 जनावरे; दोघांना अटक

अहमदनगर- शुक्रवारी रात्रीच काही गोमाता स्वयंमसेवकांनी शेंडी बायपास (ता. नगर) चौकात तीन टेम्पोतून कत्तलीसाठी जाणार्या 59 म्हशी पकडल्या होत्या. यानंतर पुन्हा शनिवारी कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरे पकडल्याने नगर शहरातून मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जनावरे जात असल्याचे समोर आले आहे.
पिकअपमध्ये भरून कत्तलीसाठी घेऊन जाणार्या 38 लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची सुटका एमआयडीसी पोलिसांनी केली. 90 हजाराचे जनावरे व साडेतीन लाखांचा पिकअप (एमएच 17 बीडी 4182) असा चार लाख 40 हजारांचा मुद्दमाल ताब्यात घेतला आहे.
शनिवारी रात्री साडे नऊ वाजता एमआयडीसीतील सह्याद्री चौकात ही कारवाई केली. या प्रकरणी संगमनेर शहरातील तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. पोलीस अंमलदार सुरेश बबन सानप यांनी फिर्याद दिली आहे. मोसिन अन्वर कुरेशी (वय 32), इजाज जलिल कुरेशी (वय 33, दोघे रा. भारतनगर, संगमनेर) व आक्रम अहमद कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील मोसिन अन्वर कुरेशी व इजाज जलिल कुरेशी यांना अटक केली आहे.
एका पिकअपमधून काही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सह्याद्री चौकातील फोर्ड शोरूमसमोर सापळा लावला. बातमीतील संशयीत पिकअप येताच पथकाने तिला थांबवले. पंचासमक्ष पिकअपची तपासणी केली असता त्यामध्ये 36 वासरे, दोन गायी मिळून आल्या. पोलिसांनी पिकअप व गोवंशीय जनावरे ताब्यात घेतले.
पिकअपमधील दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. तिघांविरूध्द भादंवि कलम 429 सह प्राण्याचा छळ प्रतिबंध कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचे परिवहन अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक टिक्कल करीत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आठरे व त्यांच्या पथकातील अधिकारी, अंमलदारांनी केली आहे.