शेतमालाला भाव मिळेना… व्यथित शेतकऱ्याने थेट भाजीपिकात जनावरे सोडली

सततचे ढगाळ हवामान, कडाक्याचे ऊन, याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे. पालेभाज्या पिवळ्या पडल्याने पालेभाज्यांच्या खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
बाजारपेठेत नेऊनही कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने मजुरी तसेच वाहतुकीचे भाडे देखील वसूल होत नाही, त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील चितळी परिसरातील एका शेतकऱ्याने भाजीपिकात जनावरे सोडली.
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, साकेगाव, पाडळी, चितळी, सुसरे परिसरात मेथी, कोथिंबीर, शेपू, या पालेभाज्यांची पिके शेतकरी घेतात.
यापूर्वी सर्वच पालेभाज्यांना चांगला बाजारभाव मिळाला. या पिकांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात पैसे मिळवून दिले. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सततचे ढगाळ हवामान, कडाक्याचे ऊन, यामुळे पालेभाज्यांच्या पिकांवर विविध रोगांचे सावट पसरले आहे. शेतकऱ्यांनी औषध फवारणीसाठी मोठा खर्च केला.
परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सध्या केवळ चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांनाच बाजारभाव मिळत आहे. सद्यःस्थितीत पालेभाज्या कडाक्याच्या ऊन्हामुळे पिवळ्या पडल्या आहेत.
या पालेभाज्यांच्या खरेदीकडे व्यापार्यांनी पाठ फिरवली आहे. बाजारपेठेत पालेभाज्या विक्रीसाठी शेतकरी नेतात. परंतु, सध्या जुडीला पाच ते सात रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.
हा बाजारभाव कमी आहे. या मिळणाऱ्या बाजारभावातून भांडवल तर दूरच; परंतु मजुरी, वाहतूक भाडेदेखील वसूल होत नाही. त्यामुळे तालुक्यातील चितळी परिसरातील शेतकर्याने पालेभाज्यांची काढणी थांबवून त्यामध्ये जनावरे सोडली आहेत.