अहमदनगर ब्रेकींग: विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड परिसरातील घरापासून जवळच असलेल्या एका विहीरीत विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता होती.
दि. 26 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या मयत महिलेचे नाव भारती राजेंद्र सोडनर असून तिचे लग्न दीड वर्षांपूर्वी झाले होते. तिला एक सात महिन्याची मुलगी आहे. मात्र, भारती ही तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याने तिच्या माहेरील कडील नातेवाईकांनी काल राहुरी पोलीस स्टेशनला येऊन ठिय्या देऊन जोपर्यंत आमची मुलगी सापडत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असा पावित्रा घेत तिच्या जिवाचे काहीतरी बरे-वाईट झाल्याची शंका उपस्थित केली.
काल सकाळी घरापासून जवळच असलेल्या विहिरीत भारतीची शोध मोहिम सुरू झाली. विहिरीत पाणी जास्त असल्याने मोठ्या अश्वशक्तीच्या मोटारी टाकून विहिरीतील पाण्याचा उपशा केला असता भारतीचा मृतदेह विहीरीतील कपारीला आढळून आला.
राहुरी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठवण्यात आला होता. परंतु, नातेवाईकांनी तिला लोणी येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तरी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
भारती सोडनर या विवाहित तरूणीचा मृत्यू संशयास्पद असून तिचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे राहुरी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी रात्री उशिरा पर्यंत मयत भारतीचे माहेरीलकडील 50 ते 60 महिलांसह नातेवाईक राहुरी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.