अहमदनगर ब्रेकींग: सरपंचाकडून दोघा भावांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर- नगर तालुक्यातील शहापूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावचे सरपंच दत्तात्रय दिलीप भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष दिलीप भालसिंग (दोघे रा. शहापूर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून सोमनाथ भानुदास बेरड व सतिष भानुदास बेरड (दोघे रा. शहापूर) या दोघा भावांवर तलवार, कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात जखमी सोमनाथ यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भालसिंग बंधूंच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सरपंच दत्तात्रय भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष भालसिंग यांना ताब्यात घेत अटक केली आहे.
सोमवारी सायंकाळी सोमनाथ बेरड हे घरी असताना दत्तात्रय भालसिंग व संतोष भालसिंग हे हातामध्ये कोयता, तलवार घेऊन सोमनाथच्या घरात घुसले. त्यांनी सोमनाथला घरातून बाहेर ओढून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केली.
जीवे मारण्याच्या उद्देशाने दत्तात्रय बेरड याने कोयता व संतोष बेरड याने तलवारीने हल्ला केला. सोमनाथ यांनी कोयता व तलवारीने अंगावर केलेले वार हुकवले. दरम्यान त्यावेळी मध्ये आलेले सतिष बेरड यांच्या नाकावर तलवार लागून ते जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत दोघांना अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करीत आहेत.