अहमदनगर ब्रेकींग: भीषण आगीत आईस्क्रीम कंपनी जळून खाक; सुमारे 25 लाखांचे नुकसान

अहमदनगर- पहाटेच्या वेळी आगरकर मळा परिसरातील बेलेश्वर कॉलनी येथे एका आईस्क्रीम बनविणार्या कंपनीत भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील आईस्क्रीम बनविण्याच्या साहित्यासह तेथील रेफ्रिजरेटरचे तब्बल 25 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कुमार श्यामलाल नारंग (रा. बेलेश्वर कॉलनी, आगरकर मळा) यांच्या मालकीची रियल आईस्क्रीम बनविणारी कंपनी आहे. कंपनीच्या तीन मजली इमारतीमध्ये पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. नागरिकांनी अग्निशामक दलाला व कोतवाली पोलिसांना माहिती दिली.
महापालिकेच्या अग्निशामक दलासह कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी असल्याने नगर शहरासह एमआयडीसी व लगतच्या तालुक्यातील अग्निशामक दलाची वाहने बोलाविण्यात आली होती. सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.
आगीत कंपनीमधील बहुतांश साहित्य जळून खाक झाले. पाच ते सहा मोठे रेफ्रिजरेटर आगीच्या भक्षस्थानी पडल्याने त्याचे पूर्णपणे नुकसान झाले. दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सुमारे 25 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.