अहमदनगर ब्रेकींग: काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ पकडला; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर- काळा बाजारात विक्री करण्यासाठी जात असलेला सुमारे पाच लाख रुपये किमतीचा तांदूळ राहुरी पोलिसांनी छापा टाकून पकडला. सदर तांदूळ व एक ट्रक (क्र.एमएच 16 सीसी 4511) असा सुमारे 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. याबाबत राहुरी पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान राहुरी पोलिसांना गुप्त खबर्या मार्फत खबर मिळाल्याने राहुरी पोलिस पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा, पोलिस नाईक सचिन ताजणे, नदीम शेख, शशिकांत वाघमारे आदि पोलिस पथकाने राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा दरम्यान सदर ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला. ट्रकमधील चालक व वाहकाकडे चौकशी केली असता ट्रकमध्ये रेशनचा तांदुळ असल्याची शंका पोलीसांना आली.
त्यावेळी पोलिस पथकाने 5 लाख 4 हजार रूपये किंमतींचा सुमारे 25 टन तांदूळ व 30 लाख रूपये किंमतीचा मालट्रक असा एकूण सुमारे 35 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आला.
याप्रकरणी पोलिस नाईक सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरुन देवळाली प्रवरा येथील सुनिल चांगदेव गल्हे, वय 43 वर्षे, तसेच ट्रक चालक उध्दव अर्जुन खाडे, वय 43 वर्षे, राहणार दरखवाडी, ता. जामखेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.