निळवंडेच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी गावे अद्याप पाण्यापासून वंचित !

कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील दुष्काळी व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात असलेले जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादराबाद, शहापूर आदी ग्रामपंचायत हद्दीत असलेले पाझर तलाव भरण्याबाबत अनेक पुढारी आणि प्रशासनाने मौन पाळल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (दि.२६) ऑक्टोबरला शिर्डीमध्ये येऊन त्यांच्या उपस्थितीत निळवंडे धरण प्रकल्पाच्या लोकार्पणासह विविध संस्थाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात केले होते. मात्र यातील उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा कालवा १० टक्के तर उजवा कालवा २५ टक्के यासह वितरण व्यवस्था १०० टक्के अपूर्ण आहे.
उजव्या कालव्याचे राहुरी तालुक्यात भूसंपादन अद्याप बाकी आहे. एकुणात हा प्रकल्प अद्याप जवळपास ३५ टक्के अपूर्ण असून सुद्धा या ५३ वर्ष प्रलंबित प्रकल्पाचे कामाचे लोकार्पण करण्याचा प्रस्थापित नेत्यांनी आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पाहून डाव आखला व त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने त्याचे पडसाद दुष्काळी भागात तीव्र स्वरूपात उमटले आहे.
अद्याप उजवा कालवा पूर्ण झालेला नाही. तर डाव्या कालव्यात गत १४ ऑक्टोबर रोजी पाणी सोडून एक टी. एम.सी. पाणी खर्ची पडले आहे. राहाता व संगमनेर तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यात आले आहे. उर्वरित पाणी पुन्हा एका प्रवरा पात्रात जात आहे.
मात्र सव्वा महिना उलटला तरी कोपरगाव तालुक्यातील पाझर तलावात एक थेंब पाणी आलेले नाही. त्यासाठी कोपरगाव, श्रीरामपूर, सिन्नर तालुक्यातील राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती कमी पडली असल्याचे शेतकऱ्यांत बोलले जात आहे.
त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात दुष्काळाचा सामना कसा करायचा, पिण्याच्या पाण्याबरोबर, आपले पशुधन कसे वाचवायचे? असे गंभीर प्रश्न तालुका प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
रांजणगाव देशमुख येथेही काही नागरिकांनी उपोषण करून त्याकडे लक्ष वेधून घेतले होते. त्यात जलसंपदा विभागाने पाझर तलाव भरण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि आज शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात एक बैठक प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, शिडीं पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, जलसंपदा विभागाचे उपअभियंता महेश गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली होती.
त्यात उपलब्ध डाव्या कालव्याच्या खाली व ऊर्ध्व नदी-नाले आदी भरण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर आदी गावातून वाहणाऱ्या नदीवर असलेले पाझर तलाव भरण्याबाबत कोणीही चकार शब्द उत्तरला नाही हे विशेष.
याबाबत निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे, नानासाहेब नेहे, माजी सरपंच ज्ञानेश्वर नेहे, विजय थोरात, दत्तात्रय थोरात आदींनी बैठकीच्या शेवटी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र त्यावर अद्याप कारवाई प्रलंबित आहे.
त्याबाबत आज (दि.२१) नोव्हेंबर रोजी सकाळी धोंडेवाडी येथील हनुमान मंदिर येथे या नियोजनाबाबत सकाळी ८.३० वाजता कालवा कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली आहे. त्यासाठी विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन निळवंडे कालवा कृती समितीचे सचिव कैलास गव्हाणे यांनी केले आहे.
अद्याप राहाता तालुक्यातील वाकडी, धनगरवाडी आदी टेल भाग, सायाळे, देवकौठे, चिंचोली गुरव, अंजनापूर, बहादरपूर, रांजणगाव देशमुख हद्दीतील पश्चिम भाग हा पाण्यापासून वंचित आहे. त्यासाठी जलसंपदा विभागास व महसूल विभागास या परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी आपली पावले उचलावी लागणार आहे. अन्यथा दुष्काळी जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागणार आहे.