भिंगारमध्ये गणरायाला निरोप; वरुणराजाची हजेरी
यानंतर मिरवणूकीस प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पावसाची संततधार सुरु असताना मोठ्या हर्षोल्हासाच्या वातावरणात गणरायांना निरोप देण्यात आला.

भिंगार येथील गणरायाला शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापन पूजा मंगळवारी (दि.२६) दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते करण्यात आली.
यानंतर मिरवणूकीस प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पावसाची संततधार सुरु असताना मोठ्या हर्षोल्हासाच्या वातावरणात गणरायांना निरोप देण्यात आला.
यावेळी पोलिस प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. याप्रसंगी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे, समीर देशमुख, कार्तिक देशमुख,आशु देशमुख, प्रज्वल देशमुख,
अक्षय देशपांडे, स्वप्निल मुळे, शिवाजी राऊत, अनिल भोसले, राजेश तनपुरे, मोरेश्वर मुळे, अनिल मुळे, भिंगार शहर राष्ट्रवादीचे संजय सपकाळ, सोपान काका साळुंखे, श्याम वागस्कर आदी उपस्थित होते.
ब्राह्मणगल्लीतील देशमुखवाडा येथील गणपती मंदिरात स्वातंत्र्य सैनिकांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. तेव्हापासून येथील गणपती मानाचा म्हणून मानला जातो.
प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाला दरवर्षी द्वादशीला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जातो. या प्रथेस १०० वर्षे पूर्ण झाली असून गणरायाचे पूजन झाल्यावर मानाचा गणपती फुलांनी सजवलेल्या पालखीतून विसर्जनासाठी मार्गस्थ होतो.
त्यानंतर गावातील व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होतात भिंगारवेस, गवळीवाडा, सदरबाजार, भिंगारयँक, वाणेगल्ली, मोमीनपुरा, पाटीलगल्ली, लोहारगल्ली, नेहरूचौक, शिवाजी चौक,
सरपणगल्ली व पुन्हा ब्राह्मणगल्ली मार्ग गणपती घाट येथील विहिरीत सायंकाळी सहा वाजता मानाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. यंदा भिंगारमध्ये १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठाना केली होती.
यंदा गणेश मंडळांनी सामाजिक आणि धार्मिक विषयांवरील देखाव्याचेही आयोजन केले होते. नागरिकांनी हे देखावे पाहण्यास चांगलीच गर्दी केली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून भिंगारसह शहरात दमदार पाऊस पडत असून गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पहावयास मिळाले.
मंगळवारी पावसाची संततधार सुरु असताना डीजेसह पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणूकीवेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहर पोलीस अधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिनकर मुंडे, चार पोलीस उपनिरीक्षक, सुमारे शंभर कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट नेमले होते. विर्सजन मिरवणूक शांततेत पार पडली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.