अवकाळी पावसाचा फटका… शेतकऱ्याने थेट कांद्यावरचा चालवला जेसीबी

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव दहिगाव-ने परिसरात यंदाचा उन्हाळा पावसाळ्यात रुपांतरित झाल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. उन्हाळ्यातील अवकाळी पावसाने मार्च नंतर एप्रिलमध्ये धुमाकूळ घातला असून, एप्रिलमधील गारपीट व पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला बसल्याचे समोर येत आहे.
शहरटाकळी येथील महेश बोरुडे यांच्या दीड एकर क्षेत्रातील कांदा पिकावर चालवला जेसीबी चालवून पिकाची विल्हेवाट लावली. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी दहिगाव-ने, मठाचीवाडी, भातकुडगाव, भायगाव, अक््तरपूर, देवटाकळी, मजलेशहर, ढोरसडे-अंत्रे भावीनिमगाव,
परिसरात मागील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवकाळीमुळे शेतातील कांदा पीक तसेच काढून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याने येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी खराब झालेल्या कांद्यावर जेसीबी चालवत असल्याचे दिसत आहे. शेतातील कांदा न काढता त्यावर नांगर चालवण्याचा वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करून शेतातच कांदा वाढण्यासाठी ठेवला होता. मात्र, मार्च महिन्यापासून सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतातील पीक हातचे गेले आहे.
काही शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतात झाकून ठेवला. मात्र, पावसाचे पाणी त्यात शिरल्याने संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे त्यातच मजूर मिळत नसल्यामुळे हजारो रुपये खर्च होऊनसुद्धा हाती काही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कांद्यावर जेसीबी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शासन फक्त पंचनामे करते.
गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने नुकसान झालेल्या पिकांची अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसताना पुन्हा एप्रिलमध्ये गारपिटीने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.
मात्र, शासनाककडून केवळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. माझ्या शेतामध्ये दीड एकर कांद्याचे पीक घेतले होते.
त्याला आतापर्यंत ९० हजार रुपये कर्ज झाला होता. शेतातील कांदा पीक काढणी करून तो शेतातून घरी गोळा करून झाकून ठेवला होता.
मात्र, अवकाळी पावसाने संपूर्ण कांदा पिक भिजल्यामुळे दहा दिवसांत सडला आहे. त्यामुळे तो पुन्हा शेतात पागून द्यावा लागत आहे असे महेश बोरुडे म्हणाले आहे.