यापुढे नदीकाठी वाळू रिक्षा दिसल्यास चालकासह पेटवून देऊ, वाळू तस्करांविरूद्ध एल्गार

संगमनेरात जुनाट भरधाव वाहणाऱ्या रिक्षातून प्रवरा नदीवरील गंगामाई घाट परीसरातून बेसुमार वाळू तस्करी रात्रंदिवस सुरू होती. या रिक्षांमुळे नदीकाठी फिरण्यास जाणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
वारंवार प्रशासनाला सांगूनही याबाबत कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या नागरीकांनी काल बुधवारी (दि.12) सकाळी वाळू तस्करांविरूद्ध एल्गार पुकारत वाळूच्या रिकाम्या गोण्यांची होळी केली.
तसेच ठिय्या आंदोलन करत यापुढे नदीकाठी वाळू रिक्षा दिसल्यास चालकासह पेटवून देऊ, असा थेट इशारा प्रशासनाला दिला आहे. याबाबत संतप्त नागरीकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
यावेळी गंगामाई ट्रस्ट, पुरोहित संघ, संगमनेर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.दरम्यान, राज्यात सत्ता परिवर्तनानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नविन वाळू धोरणाची घोषणा करत अवैध वाळू तस्करी पूर्णपणे रोखल्याचा दावा अनेकदा केला. मात्र संगमनेरात प्रवरातिरी आवर्तन काळातसुद्धा बेसुमार वाळू तस्करी सुरू असल्याचे वारंवार समोर येत होते. वाळू वाहतूकीसाठी वाळू तस्कर जुनाट रिक्षांचा वापर करीत आहे.
सध्या प्रवर नदीला पाणी असूनही हे वाळू तस्कर या पाण्यातून वाळू काढून या रिक्षा शहरातून भरधाव वेगाने फिरत आहे. विना नंबरच्या, छत नसलेल्या, चोरीच्या रिक्षांचा या वाळू तस्करीत सर्रास वापर केला जात आहे.
भरधाव वेगामुळे अनेकवेळा अपघाताची शक्यता निर्माण होत होती. या रिक्षा चालकांना कोणी अडविल्यास त्यांच्याकडून दमदाटी व प्रसंगी शिवीगाळ केली जात होती.
त्यामुळे वाळू तस्करांविरूद्ध शहरात संतापाचे वातावरण निमाण झाले होते. प्रशासनला माहित असूनही कारवाई करत नसल्याने हा संताप दिवसेंदिवस वाढत होता. अखेर काल बुधवारी सकाळी या संतापाचा उद्रेक झाला.
या रिक्षा चालकासह पेटवून देऊ
प्रवरा नदीच्या गंगामाईघाट परिसरात सकाळी अनेक नागरीक, महिला, ज्येष्ठनागरीक, स्पर्धक फिरण्यासाठी, पळण्यासाठी जात असतात. त्यांना वाळू तस्करांच्या आरेरावीला व दहशतीला अनेकदा सामना करावा लागतो. तसेच त्यांच्या रिक्षां मुळे जीविताला धोकाही निर्माण होत. त्यामुळे या नागरीकांनी या वाळू तस्करांविरूद्ध संघर्ष पुकारत त्यांच्या वाळूच्या गोण्या रिकाम्या करून त्यांची होळी केली. पोलीस, महसूल, प्रशासन या वाळू तस्करांना रोखू शकत नसेल तर आम्ही यापुढे हे सहन करणार नाही. या रिक्षा चालकासह पेटवून देऊ याची पुढील जबाबदारी ही प्रशासनाची असेल, असा इशारा नागरीकांनी दिला.