मोठी बातमी ! कुकडी डाव्या कालव्यातून ह्या दिवशी आवर्तन…

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि शेतकर्यांची मागणी लक्षात घेता कुकडी डाव्या कालव्यातून 22 मे पासून चौथे आवर्तन सोडण्याच्या सूचना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन येथे संपन्न झाली. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, अशोक पवार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुदाम पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे; पाण्याची गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकार्यांनी उपाययोजना कराव्यात.
नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण आणावे. या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगाना पाणी दिले जाते.
पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. धरणातील गाळ काढल्यास धरणातील पाणीसाठी वाढण्यास मदत होते.
त्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढून शेतकर्यांच्या शेतापर्यंत नेण्याबाबत नियोजन करावे. पिंपळगाव जोगे धरणातील पारनेर हद्दीतील 15 कि.मी. अस्तरीकरणाच्या कामाला नियामक मंडळाच्या मंजूरीनंतर सुरुवात करावी, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.