अरे बापरे! निवडणुकीच्या वादातून चौघांवर केले तलवारीने वार. एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

सोसायटीच्या निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादात एका तरुणाची हत्या, तर महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे घडली आहे.
घटनेनंतर संबंधित आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध चालू आहे. तालुक्यातील देवराई येथील सेवा सोसायटीची निवडणूक होती.
या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी गटाला १३ पैकी ११ जागांवर विजय मिळाला, तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या. विजयी उमेदवारांनी गावातून मिरवणुका काढल्या.
नंतर दोन गटांत वाद होऊन एका गटाने विजयी झालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात अजय पालवे, विष्णू पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे हे चार जण जखमी झाले.
चार पैकी दोन जखमींना पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले, मात्र या घटनेतील जखमी अजय पालवे यांचा मृत्यू झाला. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पाथर्डी पोलीसात करण्यात आली नव्हती.
हे समजल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. सुमारे दोन तास या ठिकाणी ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता.