…म्हणून मंत्री नबाब मालिकांची सुप्रीम कोर्टात धाव

मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटक कारवाईविरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे. यापूर्वी मलिक यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने ‘ईडी’ची कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतरही सत्र न्यायालयाने त्यांच्या न्यायालयाने कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. मलिक यांनी आपणास बेकायदेशीररित्या अटक करण्यात आल्याचा आरोप करतानाच अंतरिम दिलासा मिळावा यासाठी अर्ज केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना अंतरिम दिलासा नाकारला. त्यामुळे नवाब मलिक यांनी आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मलिक यांनी विशेष रजा याचिका ( स्पेशल लिव्ह पिटीशन ) दाखल करत मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. या याचिकेवर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी या याचिका अर्जातून करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने कारवाई ठरवली होती योग्य
मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. केंद्रीय तपासयंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली होती. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.