
पुढारी कामात पाच टक्के मागतो. जिल्हा परिषदेत तर आता दहा टक्के घेतल्याशिवाय कामे होत नाही, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. आम्ही सत्तेवर असताना असे कधी झाले नाही. याचा खुलासा पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत करणार आहे, असेही ते म्हणाले.
श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे खासदार विखे यांनी भेट देऊन महामार्गाच्या रस्ते कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. गावातील रस्ता कामाच्या अडचणी सोडवून ठेकेदाराला आदेश दिले.
खासदार विखे म्हणाले, दक्षिणेत चांगले सुशिक्षित लोकप्रतिधी निवडून द्या. टक्केवारी, वाळू, स्क्रॕॅप, खंडणी जमा करणारे प्रतिनिधी नको असे म्हणत त्यांनी नाव न घेता आमदार नीलेश लंकेवर निशाणा साधला.
ते म्हणाले, कोविडच्या काळात सर्वात जास्त काम आशासेविका,अंगणवाडी सेविका,जिल्हा परिषदेचे शिक्षक, आरोग्यअधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी यांनी काम पाहिले. पण दक्षिणेत काही लोकप्रतिधीनी आपले फ्लेक्स बोर्डवर फोटो छापून स्वतःचा मोठेपणा केला.
तो कशासाठी याचा सामान्य जनतेने विचार करण्याची गरज आहे. दोन वर्षानंतर नगर जिल्हा कसा असेल पहा. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात रस्त्याचे जाळे तयार करुन विकास काय असतो हे जनतेला दाखवणार आहे.
मी खासदार झाल्यानंतर माझ्या बरोबर सर्व पक्षातील कार्यकर्ते आहेत, आपण चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला विकासकामे करण्यासाठी निवडून दिले, पण राज्यात स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आलेले आज सत्तेवर बसलेले आहेत. पण या तिघाडी सरकारने कसला ही विकास केला नाही, असा आरोप खासदार डाॕॅ. सुजय विखे यांनी यावेळी केला.