ह्या शेतकऱ्यांना नाही मिळणार PM किसानचे दोन हजार ! कृषी विभागाची कारवाई सुरू ! २१ हजार १९३ खातेदार शेतकरी ‘पीएम किसान’ योजनेतून बाद

पीएम किसान सन्मान योजनेमध्ये शेतकरी खातेदाराला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यासाठी शासनाने पाच वेळा मुदतवाढ दिली. मात्र, त्यानंतरही २१ हजार १९३ खातेदारांनी अद्यापही ई- केवायसी केलेली नाही.
त्यामुळे त्यांचा लाभ थांबविण्यात आला आहे. आता या खातेदारांची नावे यादीतून कमी करण्यात येत आहेत. याबाबत कृषी विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
या योजनेचे आतापर्यंत १४ हप्ते वितरित झालेले आहेत. योजनेत अपात्र शेतकऱ्यांचा शिरकाव झाल्याने त्यांचा लाभ थांबविण्यात येऊन रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय लाभार्थ्यांना आधार लिंक व ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
त्यासाठी शासनाने तब्बल पाच वेळा मुदतवाढ दिली. याशिवाय योजनेची जबाबदारी कृषी विभागाकडे आल्यानंतर लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी, यासाठी गावागावांत शिबिरे घेण्यात आलेली आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६४ हजार ९९५ खातेदारांनी ही प्रक्रिया केली आहे. त्याची टक्केवारी ९३ इतकी आहे. तर २१ हजार १९३ खातेदारांनी वारंवार सूचना करूनही ई-केवायसी न केल्याने त्यांची नावे आता बाद करण्यात येत आहेत.
ज्या खातेदारांची ई-केवायसी झालेली नाही, त्यांच्यासाठी कृषी विभागाद्वारे शिबिरे घेण्यात आली. संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, संपर्कदेखील झाला नाही. त्यामुळे अशा खातेदारांचे नाव यादीतून कमी करण्याची प्रक्रिया कृषी विभागाने आता सुरू केली आहे.