अहमदनगर जिल्ह्यात १५० शाळांचा कायापालट ! सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार …

अहमदनगर जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १५० शाळांचा कायापालट करून मॉडेल शाळा उभारणीसाठी प्रशासकीय स्तरावर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून या शाळा संगणकीकृत करून त्यावर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार आहेत. यासाठी मिशन आपुलकीअंतर्गत लोकसहभाग घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या १५० शाळांमध्ये १९ हजार ६१६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुकानिहाय प्रत्येकी दहा शाळांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर मनपा हद्दीतील नागापूर २, केडगाव ६, मुकुंदनगर २ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळा लोकसहभागातून आदर्श करण्यात येणार आहेत.
शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास अथवा वीज जोड नसल्यास संगणक असूनही विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. यासाठी जिल्हाभरातील स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींकडून मदत घेतली जाणार आहे.
दरम्यान, या शाळांमध्ये यापूर्वी जलशुद्धीकरण यंत्र लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
आपुलकीचा हात महत्त्वाचा
मिशन आपुलकीतून आदर्श शाळा करण्यासाठी १५० शाळांची निवड केली. त्यात नगर शहरातील महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळांचाही समावेश आहे.
दानशूर व्यक्ती तसेच विविध संस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन आपुलकीचा हात पुढे केल्यास लवकरच या शाळांना सौर उर्जेतून वीजपुरवठा करणे शक्य होईल. – भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी.