
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार या परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली होती पिकांचे थोड्या प्रमाणात नुकसान (loss) झाले. मात्र विजेच्या कडकडाटासह काल पुन्हा पावसाला सुरुवात झाली असल्यानेच शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतामध्ये सध्या रब्बीचे गहू, हरभरा, भाजीपाला व कांदा पीक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लावलेले आहेत. या अवकाळी पावसामुळे कांदा व गहू पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, चांदेकसारे, सोनेवाडी अदी परिसरात बुधवारी अवकाळी पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी रात्री 7.30 वाजता अवकाळी पाऊस सुरू झाला. हा अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटासह झाला.
वादळाचे प्रमाण जास्त असल्याने गहू , कांदा , मका आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गहू काढणीला आला आहे. तर कांदा पीकही शेवटच्या पाण्यावर असतानाच अवकाळी पावसाने कहर केला आहे. पुन्हा सुरू असलेल्या पावसामुळे गव्हाचे व मकाचे पिक पडले आहे.
कांदा पिकाच्या पाथीमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे कांदा साठवणीसाठी योग्य राहणार नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावामध्ये हा कांदा विकावा लागणार आहे.
सोनेवाडी ,पोहेगाव, चांदेकसारे, डाऊच खुर्द ,घारी, देर्डे-कोऱ्हाळे, देर्ड चांदवड परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा व गव्हाचे पीक आहे.
हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाच्या नुकसानीचा अंदाज पाऊस उघडल्यानंतरच येणार आहे.